लोकसभेची चौथी निवडणूक, इंदिरा गांधींचा उदय

yongistan
By - YNG ONLINE
१९६४ : पंडित नेहरूंनी १९६२ मध्ये अनेक समस्यांचा सामना करीत सत्ता प्राप्त केली. परंतु पुढील काळ त्यांना बराच संघर्ष करावा लागला होता. चीन आणि पाकिस्तानने भारतावर आक्रमण करून देशाची सीमा असुरक्षित केली होती. पंडित नेहरूंच्या मैत्रीच्या उदार मताला चीन आणि पाकिस्तानने धुळीस मिळवले होते. या धक्क्याने १९६४ मध्ये पंडित नेहरूंचा मृत्यू झाला आणि त्यांच्या जागी गुलजारीलाल नंदा देशाचे काळजीवाहू पंतप्रधान झाले. त्यानंतर काही दिवसातच लालबहादूर शास्त्री यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. 

सन १९६५ मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध झाले. सोव्हिएत रशियाने हस्तक्षेप करीत भारत आणि पाकिस्तानमध्ये ताश्कंद करार केला. मात्र या कराराच्या वेळीच लालबहादूर शास्त्री यांचे ताश्कंदमध्ये रहस्यमय पद्धतीने निधन झाले आणि १९६६ मध्ये इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान झाल्या. इंदिरा गांधींच्याच नेतृत्वाखाली १९६७ च्या निवडणुका पार पडल्या. देश चालवण्याचा अनुभव नसलेल्या इंदिरा गांधी यांची ही पहिलीच निवडणूक होती आणि एक प्रकारे त्यांची अग्निपरीक्षाही होती. 

पंडित नेहरूंच्या अनुपस्थित झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला. परंतु मागील तिन्ही निवडणुकांपेक्षा काँग्रेसचा प्रभाव कमी दिसून आला, जागांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली. बहुमतापेक्षा फक्त २२ जागा त्यांना जास्त मिळाल्या होत्या. त्यामुळेच इंदिरा गांधी पंतप्रधानपद शाबूत ठेवण्यात यशस्वी झाल्या.
१९६२ ते १९६७ या ५ वर्षात देशात खूप घडामोडी झाल्या होत्या. भारत-पाकिस्तान युद्धासह जबलपूर आणि राउरकेला येथे झालेले दंगे हे अत्यंत भीषण असे होते. १९६५ च्या युद्धात पाश्चिमात्य देशांनी पाकिस्तानची साथ देत भारताला केली जाणारी मदत बंद केली होती. अन्नधान्याची टंचाई होती. महागाई प्रचंड वाढली होती. देशाच्या तिजोरीत खडखडाट जाणवू लागला होता. तेलाचे दर आसमानाला भिडले होते. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी रुपयाचे अवमूल्यन केले होते. या पार्श्वभूमीवर देश चौथ्या सार्वत्रिक निवडणुकांना सामोरे जात होता.

१९६७ मध्ये झालेला लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघांची पुनर्रचना केल्याने मतदारसंघांची संख्या ४९४ वरून ५२० केली होती तर मतदारांची संख्याही २५ कोटींच्या आसपास पोहोचली होती. मागील वेळेपेक्षा जास्त म्हणजे १५ कोटी २७ लाख मतदारांनी म्हणजेच ६१ टक्के मतदारांनी १५ फेब्रुवारी १९६७ रोजी झालेल्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला होता. ५२० जागांपेकी काँग्रेसला २८३ जागांवर विजय मिळवता आला.  

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि दिल्लीत काँग्रेसच्या जागा कमी झाल्या, कारण येथे जनसंघाने चांगलीच मुसंडी मारली होती. या निवडणुकीत स्वतंत्र पार्टीला ४४, जनसंघाला ३५, भाकपाला २३ आणि माकपला १ जागेवर यश मिळाले होते. तिकडे तामिळनाडूमध्ये द्रमुकने २५ जागांवर विजय मिळवला होता. 

डॉ. लोहिया यांनी काँग्रेसविरोधात जोरदार मोहीम सुरु केलेली असल्याने पश्चिम बंगाल, बिहार, पंजाब आणि ओरिसासह सहा राज्यांममध्ये काँग्रेसची सत्ता जाऊन संयुक्त आघाडी सत्तेवर आली होती. १९६७ पासून आतापर्यंत पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये काँग्रेस कधीही सत्तेवर आली नाही हेही येथे नमूद करणे आवश्यक आहे. या निवडणुकीत इंदिरा गांधी प्रथमच निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या. दिवंगत पती फिरोज खान यांच्या रायबरेली मतदारसंघातून इंदिरा गांधींनी निवडणूक लढवली आणि संसदेत जात त्यांनी दुस-यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

मागील निवडणुकीत पराभूत झालेले अटलबिहारी वाजपेयी या निवडणुकीत बलरामपूरमधून जनसंघाच्या तिकिटावर दुस-यांदा निवडून आले तर दुसरीकडे विजयाराजे शिंदे यांनी मध्य प्रदेशच्या गुना मतदारसंघातून विजय मिळवला. मात्र यावेळी त्यांनी काँग्रेस सोडून स्वतंत्र पार्टीकडून निवडणूक लढवली होती.

या निवडणुकीत इंदिरा गांधींसोबतच अनेक असे नेते प्रथमच खासदार म्हणून संसदेत पोहोचले, ज्यांनी नंतर देशाच्या राजकारणात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. जॉर्ज फर्नांडिस यांनी दक्षिण मुंबईतून काँग्रेसच्या स. का. पाटील यांचा पराभव केला. जॉर्ड फर्नांडिस सोशालिस्ट पार्टीकडून निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. राममनोहर लोहियाही प्रथमच सार्वत्रिक निवडणूक लढवून संसदेत पोहोचले होते. जनसंघाचे नेते बलराम मधोक दक्षिण दिल्लीतून, बिहारच्या मधेपुरा मतदारसंघातून सोशालिस्ट पार्टीचे बी. पी. मंडल जे नंतर बहुचर्चित अशा मंडल आयोगाचे अध्यक्ष झाले होते. आंध्रातील हिंदूपूरमधून नीलम संजीव रेड्डी निवडून आले जे नंतर देशाचे राष्ट्रपती झाले. लालबहादुर शास्त्री यांच्या जागेवर अलाहाबादमधून त्यांचे पुत्र हरीकृष्ण शास्त्री विजयी झाले. 

पंडित नेहरूंच्या मतदारसंघातून म्हणजेच फुलपूरमधून नेहरुंच्या भगिनी विजयालक्ष्मी पुन्हा निवडून आल्या. महाराष्ट्रातील सातारा मतदारसंघातून यशवंतराव चव्हाण निवडून आले. समाजवादी नेते एस. एम. जोशी आणि काँग्रेसचे नेते सी. डी. देशमुखही खासदार म्हणून संसदेत पोहोचले. १९६७ मध्ये सलग चौथ्यांदा लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र पार पडल्या. महाराष्ट्रातील मतदारसंघाची पुन्हा एकदा पुनर्ररचना झाली आणि विधानसभा सदस्यांची संख्या २६४ वरून २७० वर गेली. या निवडणुकीत काँग्रेसने २०३ जागा जिंकल्या तर दुस-या क्रमांकावर असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने १९ जागांवर विजय मिळवला. विद्यमान मुख्यमंत्री वसंतराव नाईक पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर बाळासाहेब भारदे यांची विधानसभा अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. मात्र पुढील सार्वत्रिक निवडणुकीपासून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका वेगळ््या होऊ लागल्या.