राज्याच्या विकासाला बुस्ट, ९२ हजार २३५ रोजगार निर्मिती : मुख्यमंत्री
मुंबई : प्रतिनिधी
दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे काल रात्री उद्घाटन झाल्यानंतर मंगळवार, दि. २१ जानेवारी २०२५ रोजी पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विक्रमी ४ लाख ९९ हजार ३२१ कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत. यातून सुमारे ९२ हजार २३५ इतकी रोजगारनिर्मिती होणार आहे. यातील एकच करार ३ लाख कोटींचा असून हा जेएसडब्ल्यू यांच्यासोबत करण्यात आला असून, तो स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स इत्यादी क्षेत्रात करण्यात आला.
महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट देणारा हा करार असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. उद्योगमंत्री उदय सामंत आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक दिवस आहे. दावोसमध्ये बाहेर बर्फ पडत आहे. पण येथे आतमध्ये गुंतवणुकीचा ओघ येत असल्याने गर्मी आहे, असे सांगताना ते म्हणाले की, महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ची प्रक्रिया अतिशय वेगवान आणि तितकीच सहजसोपी प्रक्रिया आहे. गुंतवणूकदारांच्या बाहेर मोठ्या रांगा लागल्या आहेत. महाराष्ट्रात एकदा याल तर पुन्हा तुम्ही बाहेर जाणार नाही, असे मी त्यांना सांगितले, असे सज्जन जिंदाल यांनी सांगितले.
दावोसमध्ये पहिला करार हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, त्याप्रमाणे राज्यातील शेवटच्या नाही, तर पहिला जिल्हा असलेल्या गडचिरोलीसाठी झाला. कल्याणी समूहासोबत संरक्षण, स्टील, ईव्ही क्षेत्रासाठी हा करार झाला. यात गुंतवणूक ५ हजार २०० कोटी रुपयांची असून ४ हजार रोजगार निर्मिती होणार आहे.
कल्याणी समुहासह
इतर कंपन्यांशी करार
आज झालेले सामंजस्य करार हे कल्याणी समूह, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, बालासोर अलॉय लि., विराज प्रोफाईल्स प्रा. लि., एबी इनबेव, जेएसडब्ल्यू, वारी एनर्जी, टेम्बो, एलमाँट, ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी, अवनी पॉवर बॅटरिज, जेन्सॉल, बिसलरी इंटरनॅशनल, एच टू पॉवर, झेड आर टू, ब्ल्यू एनर्जी मोटर्स, इस्सार, बुक माय शो, वेल्स्पून इत्यादी कंपन्यांचा समावेश असून, लॉजिस्टिक, ऑटोमोबाईल्स, स्टील, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, पायाभूत सुविधा, करमणूक, हरित ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन आदी क्षेत्रातील हे करार आहेत.