१९ राज्यांत एनडीए सरकार

yongistan
By - YNG ONLINE
मध्य भारत व्यापला, मोदींच्या तिस-या टर्ममध्ये ८ पैकी ६ राज्यांत विजय
नवी दिल्ली : वृत्तसंस्था 
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल ८ फेब्रुवारी २०२५ रोजी स्पष्ट झाला असून तब्बल २७ वर्षांनी भाजप पुन्हा सत्तेत परतला आहे. भाजपने पंतप्रधान मोदींच्या चेह-यावर निवडणूक लढवली होती. दिल्लीच्या मतदानादिवशी गंगास्रान, भर निवडणुकीत १२ लाखांची करमुक्ती भाजपच्या यशास कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे. दिल्लीत आपची वाताहत झाली असून केजरीवाल स्वत: पराभूत झाल्याने पक्षाचा बुरूज कोसळला आहे. अनेक दिग्गज नेते पराभूत झाले आहेत. 
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी विक्रमी तिस-यांदा पंतप्रधान झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने यावर्षी ८ राज्यांमध्ये निवडणूक लढवली. यामध्ये आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, ओडिशा, जम्मू आणि काश्मीर, हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंडचा समावेश आहे.  यामध्ये आंध्र, अरुणाचल, ओडिशा, हरियाणा आणि महाराष्ट्र या ५ राज्यांमध्ये भाजपचे युतीचे सरकार स्थापन झाले. सिक्कीममधील विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि एसकेएम यांच्यातील युती तुटली. तथापि, दोघेही केंद्रात एकत्र आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि झारखंडमध्ये जेएमएम यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचे सरकार आहे. दिल्लीतील भाजपच्या विजयाने देशातील १९ राज्यांमध्ये भाजपचे युतीचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे मध्य भारत भाजप आणि एनडीएमधील मित्रपक्षांचे सरकार आहे. 

२०१८ मध्ये देशातील अनेक राज्यांमध्ये सरकार स्थापन करण्याचा विक्रम भाजप आघाडीच्या नावावर होता. मार्च २०१८ मध्ये एनडीएने त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमध्ये सरकार स्थापन करून २१ राज्यांत पोहोचले. यासह एनडीएने इंदिरा गांधी यांच्या काळातील काँग्रेसच्या विक्रमाची बरोबरी केली. स्वतंत्र भारतात राज्यांच्या निवडणुका झाल्या तेव्हा केंद्रासह २१ राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता होती.
हिमाचल प्रदेश आणि झारखंडमध्ये भाजप युतीने निवडणूक जिंकली असती तर विक्रमी २१ राज्यांमध्ये त्यांचे सरकार आले असते. हा एक विक्रम ठरला असता. २०२४ मध्ये झारखंड विधानसभेत कॉंग्रेस आघाडीला ८१ जागांपैकी ५६ जागा मिळाल्या तर भाजपला २१ जागांवर घसरण झाली तर २०२२ मध्ये हिमाचल प्रदेशात ६८ जागांवर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने ४० जागा जिंकून सरकार स्थापन केले होते.

आता बिहारमध्ये पुढील परीक्षा 
बिहार विधानसभेचा कार्यकाळ नोव्हेंबर २०२५ पर्यंत आहे. त्यापूर्वी निवडणूक होईल. विधानसभेच्या २४३ जागांमध्ये आरजेडीचे ७९, भाजपचे ७८, जेडीयूचे ४५, काँग्रेसचे १९, एचएएम पक्षाचे ४, सीपीआयचे २, सीपीएमचे २, एआयएमआयएमचे एक आणि दोन अपक्ष आमदार आहेत. २०२४ मध्ये बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागांपैकी एनडीएला ३० जागा मिळाल्या होत्या, तर इंडिया आघाडीला ९ जागा मिळाल्या. १४ वर्षांनंतर पप्पू यादव अपक्ष उमेदवार म्हणून पूर्णियातून विजयी झाले. बिहारमध्ये ३५ वर्षांनंतर सीपीआय (एमएल) चे खाते उघडले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसला २ जागांचा फायदा झाला होता तर आरजेडीने पुनरागमन करत ४ जागा जिंकल्या. २०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत एनडीएने ९ जागा गमावल्या.