भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला पाहिजेत.स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतीज्ञ,तत्वज्ञ, समाजसुधारक, पत्रकार, वकील अशा महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी महु इथे झाला व संपूर्ण भारतवर्षे सुर्यासारखे लखलखायला लागले.जनुकाय बाबासाहेबांच्या रूपात या पृथ्वीतलावर दैवी शक्तीच प्रगट होवून ज्ञान जोत प्रगटली की काय असे सर्वांनाच वाटत होते. बाबासाहेबांनी समाजाच्या हितासाठी आणि देशहीतासाठी आपले प्राणपनाला लावले. त्यामुळेच त्याच्या अथक प्रयत्नाने संविधानाच्या चौकटीत संपूर्ण भारताला बांधून ठेवले व लोकशाही निर्माण केली.आज प्रत्येकाला संविधानाच्या माध्यमातून न्याय मिळत असतो.आजही अनेक देशांमध्ये हुकूमशाही दीसुन येते.परंतु बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच भारतीय लोकशाही टीकुन आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी तळागाळातील लोकांना न्याय मिळावा यासाठी अहोरात्र प्रयत्न केले.तेव्हाच भारतात न्यायव्यवस्था प्रस्थापीत झाली.कारण बाबासाहेबांना कल्पणा होती की काही मुठभर समाज देशातील सर्वसामान्यांना कलंकीत करण्याचे काम करीत आहे.परंतु बाबासाहेबांचे या संपूर्ण हालचालींवर लक्ष होते. याकरीता समाजात जातीयवाद, धर्मवाद,पंथवाद यात कटुता निर्माण होवू नये याकरिता सर्वांना एकत्र आणन्याचे काम त्यांनी केले.आज जगामध्ये अनेक देशात बाबासाहेबांच्या विचारांची जोपासना केली जाते.कारण बाबासाहेबांच्या विचारांमध्ये ज्ञाणाचा व बुध्दीमत्तेचा अथांग महासागर आहे.त्याची आपण कल्पना सुध्दा करु शकत नाही.त्याची तुलना समुद्रापेक्षाही अफाट आहे.कारण त्यांच्या बुद्धीमत्तेचा व कौशल्याचा संपूर्ण जगात आजही गुणगान होतांना आपण पहातो.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानयोगी असल्यामुळे त्यांची कला जगात कोणीही अवगत करू शकले नाही.आज भारतात संपूर्ण समाज आनंदाने रहातो व बागडतो ते फक्त बाबासाहेबांच्या विचारांमुळे व संविधानामुळेच. बाबासाहेबाचा जन्म गरीब घराण्यात झाला असला तरी ते मनाने व विचाराने खूप श्रीमंत होते.आज प्रत्येकाने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांने प्रेरीत होऊन देश घडवीण्याकरीता पुढाकार घेण्याची गरज आहे.कारण बाबासाहेबांच्या विचाराने भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला मोठी प्रेरणा दिली आहे.त्यामुळे आज जगातील प्रत्येक देशात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर केल्या जातो.परंतु आजचा राजकीय पुढारी बाबासाहेबांचे विचार विसरुन समाजाच्या प्रगतीकडे लक्ष न देता स्वतःची प्रगती करतांना दिसत आहे.याचे दु:ख बाबासाहेबांना अवश्य होत असावे. बाबासाहेब आंबेडकर,ज्योतीबा फुले इत्यादी अनेक थोर महापुरुषांनी व विचारवंत देश सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी अथक प्रयत्न केले व १९४७ ला भारत स्वतंत्र झाला.परंतु गेल्या काही वर्षांत मुठभर राजकीय पुढाऱ्यांनी भ्रष्टाचार करून वाममार्गाने मोठ्या प्रमाणात करोडोंची चल-अचल संपत्ती कमवुन देशाच्या १४० कोटी जनतेच्या खांद्यावर महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या,महागडे शिक्षणाचे ओझे लादले आहे.याचे दु:ख बाबासाहेबांना अवश्य होत असेल.स्वत:ला लोकप्रतिनिधी,जनप्रतिनिधी व स्वयंघोषित समाजसेवक समजणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांनो आपण वाममार्गाने कमविलेली करोडोंची चल-अचल संपत्ती सरकारच्या तिजोरीत जमा करावी किंवा जनकल्याणासाठी उपयोगात आणावी.असे जर कार्य राजकीय पुढारी करीत असेल बाबासाहेबांना राजकीय पुढाऱ्यांची खरी आदरांजली होईल.कारण बाबासाहेबांनी समाज हितासाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले याला कुठेही तडा जाणार नाही याची जाण आजच्या राजकीय पुढाऱ्यांनी ठेवायला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर आपले सर्वांचेच दैवत आहे.त्यामुळे जयंतीच्या निमित्ताने देशातील प्रत्येक व्यक्तीने, प्रशासनाने व सरकारने वृक्षारोपणाचा संकल्प केला पाहिजे.कारण दिवसेंदिवस निसर्गाचा ह्यास होत आहे.त्यामुळे निसर्गाला वाचविण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.त्यामुळे १४ एप्रिलला वृक्षारोपण व्हायला हवे यामुळे एकाच दिवशी देशात लाखोंच्या संख्येने वृक्षलागवड होईल आणि संपूर्ण निसर्ग प्रफुल्लित होईल व प्रत्येक झाडात, पानात व फुलात आपल्याला बाबासाहेबांचे दर्शन अवश्य होईल.
रमेश कृष्णराव लांजेवार