भारताच्या जीडीपीचे मोठे नुकसान
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जागतिक आरोग्य संघटनेच्या (Þडब्ल्यूएचओ) अभ्यासानुसार तंबाखूमुळे देशाच्या जीडीपीचे मोठे नुकसान होत आहे. देशात तंबाखूमुळे होणारे आजार आणि अकाली मृत्यू यामुळे जीडीपीच्या १ टक्क्याहून अधिक नुकसान होत आहे. याचाच अर्थ तंबाखूपासून सरकारला जितका पैसा सरकारला मिळतो, त्यापेक्षा जास्त पैसा उपचार आणि जनजागृतीसाठी खर्च होतो.
२०१७ ते २०१८ दरम्यान ३५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये तंबाखूमुळे होणारे सर्व रोग आणि मृत्यू यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेचे २७.५ अब्ज किंवा १.७७ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याचा अर्थ प्रत्येक १०० रुपयांच्या करामागे तंबाखूमुळे ८१६ रुपयांचे नुकसान होते. तंबाखूच्या आर्थिक ओझ्यापैकी ७४ टक्के धुम्रपानामुळे आणि २६ टक्के तंबाखू चघळल्यामुळे नुकसान होत आहे. तंबाखूशी संबंधित एकूण आर्थिक भारांपैकी ९१ टक्के भार पुरुष सहन करतात, तर उर्वरित ९ टक्के स्त्रिया सहन करतात. जागतिक आरोग्य संघटनेचे भारतातील प्रतिनिधी रॉडेरिको एच. आॅफ्रिन यांच्या मते भारतात २०११ ते १८ या दरम्यान तंबाखूच्या वापरामुळे आरोग्य सेवा खर्चात वाढ झाली आहे. याचा अर्थ सरकारला यामुळे आरोग्यावर जास्त पैसा खर्च करावा लागतो. तंबाखू नियंत्रणासाठी सरकारने कठोर पावले उचलले तर लाखो जीव वाचू शकतात.