मुंबई : प्रतिनिधी
राज्यात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मागच्या काही वर्षांत ही संख्या चांगलीच वाढली आहे. मात्र, जशी वाहनांची संख्या वाढली, तशी बेवारस वाहनांची संख्यादेखील मोठी आहे. राज्यात सध्या तब्बल २ कोटी वाहने बेवारस असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. वाहनांच्या माध्यमातून वाढलेले गुन्हे आणि वाहनांचा गैरवापर पाहता वाहनांना हाय सेक्युरिटी नंबर प्लेट लावणे बंधनकारक केले आहे. परंतु या मोहिमेला अद्याप यश आलेले नाही.
केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार रस्त्यावर धावणा-या प्रत्येक वाहनाला हाय सेक्युरिटी नंबर प्लेट लावणे बंधनकारक आहे. त्याची अंमलबजावणी सुरू होऊन तब्बल १२ वर्षे होत आली तरी अद्याप जुन्या वाहनांना सदरची नंबर प्लेट लावण्यात आलेली नाही. त्याबाबत परिवहन विभाग उदासीन असल्याचा आरोप नॅशनल रोड सेप्टी कौन्सिलचे सभासद डॉ. कमलजीत सॉय यांनी आज केला.
देशभरात सुमारे ३८ कोटी वाहने आहे तर देशात एकूण घडणा-या गुन्ह्यांंपैकी ९९ टक्के गुन्ह्यांंमध्ये वाहनांचा वापर केला जातो. तसेच त्यांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड केली जात असल्याने गुन्ह्यांची उकल करताना गुन्ह्यात वापरलेले वाहन कोणाचे आहे, याचा शोध लावणे कठीण होते. त्याची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने २०१२ मध्ये वाहन कायद्यात बदल करत वाहनांना हाय सेक्युरिटी नंबर प्लेट लावणे बंधनकारक केले आहे. या नंबर प्लेटशी छेडछाड करता येत नाही. त्याचबरोबर त्यावर असलेल्या १३ अंकी युनिक नंबरमुळे सदरची गाडी कोणाच्या नावावर आहे. याचा सहजपणे शोध घेता येतो. त्यामुळे हाय सेक्युरिटी नंबर प्लेट लावणे बंधनकारक केले आहे. मात्र, आतापर्यंत राज्याला यश आलेले नाही.
-देशात ३८ कोटी वाहने
-९९ कोटी गुन्ह्यांत वाहनाचा वापर
-बेवारस वाहनांचा धोका