लालकृष्ण अडचणी यांना भारतरत्न

yongistan
By - YNG ONLINE

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना शनिवार, दि. ३ फेब्रुवारी २०२४ रोजी भारतरत्न पुरस्कार जाहीर केला. नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत याबाबतची घोषणा केली. अडवाणी यांच्या भारतीय राजकारणातील योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. काही दिवसांपूर्वी बिहारचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते जननायक कर्पुरी ठाकूर यांना भारत सरकारतर्फे मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला होता. आता आज नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर केला.

लालकृष्ण अडवाणी अलीकडच्या काळातील सर्वाधिक सन्मान मिळालेले राज्यकर्ते आहेत. अडवाणी यांनी शेवटच्या घटकापासून कामाला सुरुवात करून उपपंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारत देशाची सेवा केली. त्यांनी गृह खाते आणि माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून देखील काम केले. अडवाणी यांनी भाजपच्या स्थापनेपासून सर्वाधिक काळ पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम केले. १९८० मध्ये भाजपच्या स्थापनेतदेखील त्याचे मोठे योगदान होते. 

भाजपच्या स्थापनेनंतर ते १९८६ मध्ये पहिल्यांदा पक्षाचे अध्यक्ष बनले. १९८६ ते १९९० पर्यंत ते पक्षाचे अध्यक्ष होते. १९९३ ते १९९८ आणि २००४ ते २००५ या कालावधीत देखील लालकृष्ण अडवाणी यांनी पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम केले. खासदार म्हणून ते जवळपास तीन दशके संसदीय राजकारणात सक्रीय आहेत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये अडवाणी यांनी १९९९ ते २००४ मध्ये उपपंतप्रधानपद भूषवले होते.

सिंध प्रांतात जन्म
अडवाणी यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९२७ रोजी स्वातंत्र्यपूर्व भारतातील सिंध प्रांतात झाला होता. त्यांनी कराचीतील सेंट पॅट्रिक्स स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम सुरू केले. तसेच राजस्थानमध्ये आरएसएसचे प्रचारक म्हणून काम केले. १९५७ मध्ये अडवाणी राजस्थान सोडून दिल्लीत आले. दिल्लीत तीन वर्ष काम केल्यानंतर ते पत्रकार म्हणून काम करू लागले. त्यांनी संघाच्या ऑर्गनायझरमध्ये सहायक संपादक म्हणून काम केले. १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला २ जागांवर विजय मिळाला होता, त्यानंतर अडवाणीकंडे पक्षाची जबाबदारी आली. त्यामुळे भाजपच्या जडणघडणीत त्यांचा फार मोठा वाटा आहे.

आदर्श, तत्वाच्या पालनाचा सन्मान
हा केवळ एक व्यक्ती म्हणून माझ्यासाठीच नव्हे, तर मी ज्या आदर्श आणि तत्त्वांचे पालन करण्याचा प्रयत्न केला त्याचा हा सन्मान आहे. मी अत्यंत नम्रतेने आणि कृतज्ञतेने भारतरत्न स्वीकारतो अशी प्रतिक्रिया लालकृष्ण अडवाणी यांनी दिली.