नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवनने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. क्रिकेट वर्तुळ आणि चाहत्यांमध्ये प्रेमाने (गब्बर) म्हणून ओळखल्या जाणा-या ३७ वर्षीय क्रिकेटपटूने शनिवार, दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून ही घोषणा केली. यामुळे त्याची क्रिकेटमधील एक शानदार कारकीर्द संपली.
धवनने एका दशकाहून अधिक काळ भारतीय क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. शिखरने भारतासाठी पहिला एकदिवसीय सामना २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध विशाखापट्टणम येथे खेळला होता. त्याने १६७ सामन्यांत ६७९३ धावा केल्या. यात त्याच्या नावावर १७ शतके आणि ३९ अर्धशतके आहेत तर धवनने ६८ टी-२० सामन्यांत १७५९ धावा केल्या आहेत. त्याने मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली कसोटी खेळली. २०१३ पासून त्याने आतापर्यंत ३४ कसोटीमध्ये २३१५ धावा काढल्या. त्याची सर्वोच्च धावसंख्या १९० आहे. धवनने आयपीएलमध्येही खूप धावा केल्या. क्रिकेटच्या इतिहासातील तो सर्वांत यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो विराट कोहलीनंतर दुस-या क्रमांकावर आहे. धवनने २२२ आयपीएल सामन्यांमध्ये ६७६९ धावा केल्या आहेत. यात त्याने २ शतके आणि ५१ अर्धशतके केली आहेत. धवनने १० डिसेंबर २०२२ रोजी बांगलादेशविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.