चेन्नई : भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना चेन्नईमध्ये खेळवण्यात आला. दुस-या दिवसाचा म्हणजे २० सप्टेंबर २०२४ रोजी खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने ३ विकेट्स गमावत ८१ धावा केल्या. यासह भारताने पहिल्या कसोटीत ३०१ धावांची आघाडी मिळवली. दुस-या डावात फलंदाजी करताना विराट कोहली १७ धावा करत बाद झाला. पण या १७ धावांच्या खेळीतही विराटने मोठी कामगिरी केलीे. भारतात १२ हजार आंतरराष्ट्रीय धावा करणारा विराट भारतातील दुसरा फलंदाज ठरला आहे.
बांगला देशाविरुद्ध पहिल्या डावात तो केवळ ६ धावा करून बाद झाला तर दुस-या डावात १७ धावा करत बाद झाला. या दुस-या डावातील फलंदाजीदरम्यान ५ धावा करताच त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. विराट कोहलीने भारतात १२ हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो भारताचा दुसरा फलंदाज ठरला. त्याचवेळी, विराट हा जगातील केवळ ५ वा फलंदाज आहे, ज्याने आपल्या घरच्या मैदानावर १२ हजार आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत.
कोहलीने क्लबमध्ये मिळवले स्थान
घरच्या मैदानावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरने भारतात एकूण १४,१९२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँंिटग १३११७ धावांसह या यादीत दुस-या स्थानावर आहे. जॅक कॅलिसनेही दक्षिण आफ्रिकेत १२३०५ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर कुमार संगकारालाही श्रीलंकेत १२०४३ धावा करण्यात यश आले. आता या महान खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचाही समावेश झाला आहे.
आणखी एक विक्रम
विराटने जर या मालिकेत आणखी ३५ धावा केल्या तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २७ हजार धावा पूर्ण करेल. हा आकडा गाठणारा तो जगातील चौथा फलंदाज ठरणार आहे. याआधी केवळ सचिन तेंडुलकर, रिकी पाँंिटग आणि कुमार संगकारा यांनाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २७ हजार धावा करता आल्या होत्या.