मुलांवर अपेक्षांचे ओझे किती लागणार?

yongistan
By - YNG ONLINE

आपली मुले दहावी व बारावीला गेल्यावर बहुतांश पालकांच्या मनातील अपेक्षा जाग्या होतात. त्यांची मुलांबद्दल असणारी मानसिक इच्छाशक्ती प्रचंड वाढते. त्यांना वाटत असते की, आपला मुलगा डॉक्टर व्हावा, आपली मुलगी इंजिनीयर व्हावी, आपला मुलगा कलेक्टर व्हावा आणि आपली मुलगी क्लासवन अधिकारी व्हावी, म्हणून अनेक पालक आपल्या अपेक्षांचे ओझे  जबरदस्तीने आपल्या मुलांवर सोपवून मोकळे होताना दिसतात. मुलांची मानसिक इच्छाशक्ती त्या क्षेत्रात आहे किंवा नाही याची खात्री न करता केवळ आपली इच्छा म्हणून बहुतांश पालक आपल्या मुलांना वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी मजबूर करतात. त्यांची आवड लक्षात न घेता, त्यांचा बौद्धिक कल न ओळखता, त्यांची रुची कोणत्या क्षेत्रात आहे, हे न बघता केवळ सामाजिक प्रतिष्ठेसाठी आणि आपल्या मोठेपणासाठी बहुतांश आईवडील आपल्या मुलांना डॉक्टर, कलेक्टर, अभियंता किंवा उच्च पदस्थ अधिकारी होण्यासाठी अपेक्षांचे ओझे त्यांच्या मानगुटीवर लादतात. त्यासाठी भरपूर पैसा ओतून आपल्या मुलांना नामांकित क्लासेसला पाठवतात. चांगल्या व नामांकित कॉलेजला प्रवेश घेऊन देतात. बिचारे मुलेही आई-वडिलांच्या शब्दांचा मान ठेवून त्यांच्या इच्छेप्रमाणे वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी क्षेत्रात पदार्पण करतात. आणि त्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. परंतु त्या क्षेत्रात त्यांची म्हणावी तेवढी आवड नसल्यामुळे पहिल्याच प्रयत्नात त्यांना यश काही मिळत नाही. त्यांना यशाचे गाव काबीज करण्यासाठी वाटचाल अपयशाने करावी लागते. तेव्हा कुठे जबरदस्त अडथळ्याची शर्यत पार केल्यावर यश काबीज करता येते. म्हणून वाटचाल करताना कधी कधी अपयशाला सुद्धा पचवावे लागते. अपयशाशिवाय यश मिळवणे शक्य नाही आणि पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होणारा बहाद्दर अजून तरी जन्माला आला नाही.परंतु पालकांना मात्र आपला मुलगा पहिल्याच प्रयत्नात यशस्वी व्हावा असे वाटत असते. ते कसे शक्य होईल हो? या जगात जेवढे काही लोक यशस्वी झालेत त्यांना अपयशातून पुढे जावे लागले आहे. हे पालकांनी विसरता कामा नये. पण आजकालच्या पालकांना मुलाचे आलेले अपयश का सहन होत नाही. आपल्या मुलासाठी पालक एवढे क्रूर का बनतात? हे कळायला मार्ग नाही. कारण आजकाल प्रत्येक बापाची अशी मानसिकता झाली आहे की, मुलगा अपयशी झाल्यामुळे आपली सामाजिक प्रतिष्ठा कमी होईल, आपल्याला मित्रपरिवार, भावकी, गावकी आणि नातेवाईक काय म्हणतील? या भीतीपोटी ते प्रचंड रागात असतात. त्यांना आलेला राग अनावर होत नाही. म्हणून हा राग ते आपल्या मुलांवर काढतात. त्यांना शिवीगाळ करतात. त्वेषाने बेदम मारून खडे बोल सुनावतात. तू माझ्या सामाजिक प्रतिष्ठेचा अपमान केलास. तुला एवढा पैसा ओतून चांगल्या क्लासेसला पाठवले, चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळवून दिला आणि तू मात्र शेवटी मला यश दाखवण्याऐवजी अपयश दाखवलास. माझी सामाजिक प्रतिष्ठा कमी केलास. म्हणून त्याला बेदम मारहाण केली जाते किंवा घराबाहेर काढले जाते. आता तू आमच्या घरी येऊ नकोस, आम्हाला तोंड दाखवू नकोस, तिकडेच कुठेही जाऊन रहा म्हणून त्याला स्पष्ट भाषेत सुनावले जाते. पण त्या आईवडिलांना कोण सांगणार की, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. अपयशाच्या वाटेने प्रवास केल्याशिवाय यशाला काबीज करता येत नाही. एखादे अपयश आले म्हणून माणूस संपतो असे समजणे साफ चुकीचे  ठरते. जीवनात अपयश आहे म्हणून यशाची व्याख्या करता येते. या जगात दहावी व बारावीला अपयश आलेले कित्येक मुले पुढे चालून हजारो तरुणांचे आयडॉल झाले आहेत. लाखो युवकांचे प्रेरणास्थान झाले आहेत. जे विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात अपयशी ठरतात, ते विद्यार्थी औद्योगिक क्षेत्रात यशस्वी होतात. आणि जे विद्यार्थी औद्योगिक क्षेत्रात अपयशी ठरतात ते विद्यार्थी कृषी क्षेत्रात आपले नाव कमावतात. कारण प्रत्येक विद्यार्थ्याचा कल हा वेगवेगळ्या क्षेत्रात वेगळा असतो. कोणी शैक्षणिक क्षेत्रात हुशार असतो तर कोणी औद्योगिक क्षेत्रात तरबेज असतो. कोणी राजकीय क्षेत्रात चाणाक्ष असतो तर कोणी कृषी क्षेत्रात जाणकार असतो. त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांवर कोणत्याच अपेक्षांचे ओझे न ठेवता त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना क्षेत्र निवडण्याची संधी द्यावी. मग पहा ते सुद्धा नक्कीच संधीचे सोने करून दाखवतील. आणि तुम्ही जर त्यांच्यावर नाहक अपेक्षांचे ओझे लादण्याचा प्रयत्न केला तर ते अपेक्षांचे ओझे पेलण्यात अपयशी ठरतील. हे अटळ सत्य कोणालाही नाकारता येणार नाही. नुकतेच काही दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यात काळजाचा थरकाप उडवणारे एक प्रकरण घडले. ते प्रकरण सध्या सोशल मीडियावर व महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाले आहे. ते प्रकरण असे होते की, आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावात एक धक्कादायक आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. नीट सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या रागातून वडिलांनी आपल्या १७ वर्षीय मुलीला बेदम मारहाण केली आणि मारहाणीत मुलीचा जागीच मृत्यू झाला असून संपूर्ण महाराष्ट्रातून या घटनेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ही मनाला हेलावून टाकणारी घटना ऐकून संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. पण सभ्य व सज्जन माणसांसाठी ही खूप हळहळ व्यक्त करणारी दुःखदायक बाब आहे. त्या निर्दयी व क्रूर बापाला पोटच्या गोळ्याला बेदम मारहाण करताना दया व माया कशी काय आली नसेल? त्याचे हृदय एवढे कठोर पाषाणाचे कसे बनले असेल? पोटचा गोळा संपवताना त्याच्यातली सहानुभूती का जागृत झाली नसेल? खरोखरच हे विचार करायला लावणारे प्रश्न आहेत. बारावीच्या सराव परीक्षेत त्या मुलीला थोडेफार कमी गुण मिळाले, म्हणून कायमचे संपवायचे का? पुन्हा जोमाने अभ्यास करून यशाला गवसणी घालता येणार नाही का? मान्य आहे की, त्या मुलीला कमी गुण मिळाले आणि तिला अपयश आले पण तिला अपयश आले म्हणून तिचे सर्व काही संपले का? जगात अपयश आलेल्या व्यक्तीच भविष्यात यशस्वी व्यक्ती म्हणून ओळखल्या जातात.मग तिला अपयश आले तर काय झाले? ती भविष्यात यशस्वी होणार नव्हती का? एवढ्याशा अपयशाने संतापून बापाने टोकाचा निर्णय घ्यावा आणि त्या मुलीला कायमचे ठार करावे, हे खरंच लोकशाही प्रधान देशासाठी योग्य आहे का?  विश्व निर्माण करण्यासाठी शून्यातून प्रवास करावा लागतो. हे त्या बापाला कधी कळणार? तशी तर ती मुलगी खूप हुशार होती. गावातील शाळेत दहावी बोर्ड परीक्षेत ती ९२ टक्के गुण घेऊन वर्गात प्रथम आली होती. आणि भविष्यात देखील ती खूप मोठ्या पदावर रुजू होणार होती. पण तिच्या क्रूर बापाला परीक्षेत मिळालेले कमी गुण जिव्हारी लागले होते. त्या मुलीला कमी गुण मिळाले म्हणून जेव्हा त्या बापाला कळाले तेव्हा त्या बापाने मुलीला रागाने खडे बोल सुनावले. तेव्हा मुलीने मुख्याध्यापक बापाला म्हटले की, बारावीला तुम्हाला काय लय गुण मिळाले होते का? तुम्ही काय कलेक्टर झालात का? हे प्रश्न मुलीने बापाला केल्यावर त्या अमानुष बापाने संतापून टोकाचा निर्णय घेतला आणि त्या मुलीच्या डोक्यात वरवंटा घालून तिला रक्ताच्या थारोळ्यात पाडून तिची जीवनयात्रा कायमची संपवली. एका मुख्याध्यापक बापाने स्वतःच्या मुलीला जर अमानुषपणे ठार मारले असेल तर विद्यार्थ्यांनी त्या मुख्याध्यापक शिक्षकाकडून कोणती प्रेरणा घ्यावी? तो मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मार्गदर्शन करण्याच्या लायकीचा असेल का? तो खरच विद्यार्थ्यांना प्रामाणिक न्याय देईल का? त्याला स्वतःची मुलगी नीट जगवता आली नाही तर तो शिक्षकांना, विद्यार्थ्यांना व शाळेला काय सांभाळणार? मला मान्य आहे की, त्या बापाने त्याच्या अपेक्षा पूर्ण न केल्यामुळे व त्याला मुलीने उलटसुलट बोलल्यामुळे मुलीला ठार मारले पण कदाचित असेही झाले असते की, त्या मुलीच्या मानगुटीवर बापाने अपेक्षांचे ओझे लादल्यामुळे मुलगी सुद्धा एकदिवस आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाली असती. कारण आजकाल प्रत्येक आईवडिलांना वाटत आहे की, आपल्या मुलांनी आमच्या मनावर शिक्षण घ्यावे, आमच्या मनावर शैक्षणिक क्षेत्र निवडावे, आमच्या  इच्छेप्रमाणे परीक्षेत गुण घ्यावेत, म्हणजे संपूर्ण शैक्षणिक प्रवासच आमच्या मनावर पार पाडावा आणि डॉक्टर, कलेक्टर, इंजिनीयर किंवा उच्च पदस्थ अधिकारी व्हावे आणि आमच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात. असे आजकाल बहुतांश पालकांना वाटत आहे. पण हे खरंच शक्य होईल का हो? मुलांना कोणते क्षेत्र चांगल्या प्रकारे हाताळता येते, हे मुलांनाच माहीत असते. त्यांना कोणत्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करता येते, हे पालकांना काय माहित? पालकांना फक्त त्यांच्यावर अपेक्षा लादणे एवढेच माहित... त्यांच्या मनातले ओळखायला सहानुभूती लागते, ती सहानुभूती पालकांमध्ये नाही म्हणून आजकालचे पालक आपल्या मुलांना क्रूर बनून अमानुषपणे ठार मारत आहेत किंवा त्यांना आत्महत्या करण्यास मजबूर करत आहेत. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. आपल्या आवडी त्यांना कशा आवडतील? आपल्या मनातील इच्छा आणि त्यांच्या मनातील इच्छा वेगवेगळ्या असतात. म्हणून पालकांनो आपल्या मनातील इच्छा त्यांच्या मनावर लादण्याचा प्रयत्न करून त्यांना मरणाच्या खाईत ढकलू नका...मुलांना ज्या क्षेत्राची आवड आहे, त्या क्षेत्रात शिक्षण घेऊ द्या...आणि त्यांना त्यांचे चांगले करिअर करू द्या...सचिन तेंडुलकर दहावी नापास आहे पण  दहावीच्या पुस्तकात सचिन तेंडुलकरवर धडा आहे...यशाचा धडा गिरवायला तेवढाच धडा पुरेसा आहे.म्हणजे सचिन तेंडुलकर शिक्षण क्षेत्रात अपयशी ठरला पण क्रीडा क्षेत्रात यशस्वी होऊन तो क्रिकेटचा देव बनला, हे विसरून चालणार नाही.