नवी दिल्ली : वृत्तसंस्था
ऑपरेशन सिंदूरदरम्यान चीन, पाकिस्तान आणि तुर्की या तीन देशांनी भारताविरुद्ध भूमिका घेतली होती. आता या तीन देशांना धडकी भरवणारी चाचणी भारताने केली आहे. भारताच्या आकाश प्राइम एअर डिफेन्सची दि. १६ जुलै २०२५ रोजी लडाखमध्ये यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. ही चाचणी १५ हजार फूट ऊंचीवर घेण्यात आली. यामुळे शत्रू राष्ट्र भारताविरोधात पाऊल टाकताना विचार करतील.
चाचणी सुरू असताना जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या मिसाईलने अत्यंत ऊंच क्षेत्रात वेगानं जाणाऱ्या विमानांवर दोन वेळा थेट प्रहार केला. आकाश प्राइम सिस्टीम भारतीय सेनेत आकाश एअर डिफेन्स सिस्टीमची तिसऱ्या आणि चौथ्या रेजिमेंटची स्थापना करेल. या सिस्टिमने ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान चीनच्या विमानांना आणि तुर्कीच्या ड्रोनच्या हल्ल्यांना निष्प्रभ केले होते. आकाश प्राइम एअर डिफेन्सची चाचणी डीआरडीओ आणि इंडियन आर्मीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकत्र येत केली.
या यशस्वी चाचणीनंतर भारतीय सैन्याच्या हवाई संरक्षण नेटवर्कचा भाग म्हणून आकाश प्राइम डिफेन्स सिस्टीमला सामील करुन घेण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. आकाश एअर डिफेन्स सिस्टीमची तिसरी आणि चौथी रेजिमेंट आकाश प्राईमचा वापर करण्यासाठी बनवली जाऊ शकते. आकाश प्राइम भारताच्या आत्मनिर्भर संरक्षण उत्पादने हवाई संरक्षण यासारख्या क्षेत्रातील व्यापक प्रयत्नांचा भाग आहे.
स्वदेशी निर्मित आणि विकसित आकाश एअर डिफेन्स सिस्टीम जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या मिसाईल एअर डिफेन्स सिस्टीमनं पश्चिमेकडून सीमा आणि जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्यांना नाकाम करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हवाई हल्ल्यांना प्रतिबंध करण्यात आणि त्यापासून बचाव करण्यासाठी आकाश प्राइम एअर डिफेन्स सिस्टीमची स्थापना करण्यात आली आहे.