रेल्वे प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार
मुंबई : प्रतिनिधी
बीड जिल्ह्याच्या विकासात गेम चेंजर ठरणा-या ‘अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ’ या महत्त्वाकांक्षी नवीन ब्रॉड गेज रेल्वेमार्ग प्रकल्पाला गती देण्यासाठी राज्य शासनाने तब्बल २ हजार ९१ कोटी रुपये उपलब्ध करुन दिले आहेत. त्यात सोमवार, दि. १५ सप्टेंबर २०२५ रोजी नव्याने १५० कोटींची भर घालून तो निधी आज वितरीत करण्यात आला. या निधीच्या वितरणामुळे या रेल्वे प्रकल्पाच्या कामाला अधिक गती मिळणार असून, बीडकरांना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची अनोखी भेट दिली.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या मुहूर्तावर म्हणजेच १७ सप्टेंबर रोजी ‘बीड-अहिल्यानगर’ या टप्प्यावरील रेल्वेसेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक घटनेमुळे बीड जिल्ह्यातील लाखो नागरिकांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे. ‘अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ’ या प्रकल्पासाठी राज्य शासनाचा एकूण आर्थिक सहभाग ५० टक्के असून, आजवर शासनाने तब्बल २ हजार ९१ कोटी रुपये उपलब्ध करून दिले. त्यात आता नव्याने १५० कोटींची भर घालण्यात आली. या निधीचा उपयोग २०२५-२६ या आर्थिक वर्षात रेल्वे विभागाला राज्य सरकारचा हिस्सा देण्यासाठी केला जाणार आहे.
‘अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ’ हा रेल्वेमार्ग सुमारे २६१ किलोमीटर लांबीचा असून, त्याचा एकूण खर्च ४ हजार ८०५ कोटी रुपये इतका आहे. त्यातील ५० टक्के म्हणजे २ हजार ४०२ कोटी रुपये राज्य शासनाचा वाटा आहे. आजपर्यंत शासनाने तब्बल २ हजार ९१ कोटी २३ लाख रुपये उपलब्ध करून दिले. त्यात आता आणखी १५० कोटींची भर घालण्यात आली असून या निधीचे वितरण आज (१५ सप्टेंबर २०२५ रोजी) करण्यात आले. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दोन दिवस आधी वितरीत करण्यात आलेल्या या निधीमुळे या प्रकल्पाच्या विकासाला गती येणार आहे. या निधीचा उपयोग २०२५-२६ या आर्थिक वर्षात रेल्वे विभागाला राज्य सरकारचा हिस्सा देण्यासाठी होणार आहे.
बीड-अहिल्यानगर रेल्वे धावणार
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या मुहूर्तावर ‘बीड-अहिल्यानगर’ या टप्प्यावरील रेल्वे धावणार असून त्याचा थेट फायदा बीड जिल्ह्यातील लाखो नागरिकांना होणार आहे. अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वेमार्ग म्हणजे बीड, अहिल्यानगर आणि परळी वैजनाथ भागातील शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक, व्यापारी आणि सामान्य जनतेसाठी विकासाला नवी गती देणारा प्रकल्प आहे, असे अजित पवार म्हणाले.