भारत हा दक्षिण आशियामधील एक प्रमुख देश आणि जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. भारत क्षेत्रफळाने जगातील ७ वा सर्वांत मोठा देश आहे तर लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताला हजारो वर्षे जुना इतिहास आहे, अनेक साम्राज्ये या भूमीत विकसित पावली व लयाला गेली. भाषा, ज्ञान, अध्यात्म, कला, धर्म या बाबतीत जगाला या देशाने मोठा वारसा दिला. उष्ण कटिबंधातील ह्या देशात विविध प्रकारचे हवामान अनुभवायास मिळते. अनेक भाषा, अनेक प्रांत, अनेक रितीरिवाज आहेत. परंतु या विविधतेत एकता हे या देशाचे वैशिष्ट्य आहे. भारताला प्राचीन धार्मिक व सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. भारतीय संस्कृतीला जगात मानाचे स्थान आहे.
भारतीय राज्यघटनेनुसार भारतात संसदीय लोकशाही आहे. लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह तर राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. लोकसभेतील खासदार हे निवडणुकीतून निवडले जातात. लोकसभेत एकूण ५४५ खासदार आहेत. राज्यसभेतील खासदार विशिष्ट मतदारसंघांतून निवडले जातात. कला, क्रीडा, साहित्य, उद्योग, सहकार, सामाजिक संस्था अशा ठिकाणी काम करत असणाऱ्यांना या राज्यसभेत खासदारकी मिळते. राष्ट्रपती घटनात्मक दृष्ट्या भारतीय शासनातील सर्वोच्च पद आहे. राष्ट्रपतींची निवडणूक ही लोकसभा, राज्यसभा व विविध राज्यातील आमदारांच्या मतदानाप्रमाणे होते. हीच स्थिती विधानसभेतही असते. ज्या पक्षाला विधानसभेत बहुमत मिळते, त्याच पक्षाची राज्यात सत्ता येते. राज्यात एकूण २८ राज्ये आणि ९ केंद्रशासित प्रदेश आहेत. ९ केंद्रशासित प्रदेशांपैकी दिल्ली, पुद्दुचेरी, जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात लोकनिर्वाचित सरकार आहेत. ईतर केंद्रशासित प्रदेशात केंद्र शासन नियुक्त प्रशासनाद्वारे कारभार चालतो.
देशाची चतुःसीमा
भारतीय द्वीपकल्प अरबी समुद्र, हिंदी महासागर व बंगालच्या उपसागराने वेढलेला आहे. हिंदी महासागरात तामिळनाडूच्या जवळ श्रीलंका हा शेजारी देश आहे. पश्चिम बंगाल ते त्रिपुरापर्यंत घोड्यांच्या नाल्याच्या आकारात बांगलादेशास वेढलेले आहे. पूर्वेस म्यानमार आहे तर पूर्वोत्तर राज्यांच्या सीमा चीनला भिडल्या आहे. सिक्कीम व अरुणाचल प्रदेश यांच्यामधील प्रदेशात भूतान देश आहे. सिक्कीम व उत्तरांचल राज्यांच्या मध्ये नेपाळची सीमा उत्तर प्रदेश व बिहार या राज्यांना लागते. उत्तरांचलपासून पुन्हा उत्तरेकडे लद्दाखपर्यंत चीनची सीमा आहे. काश्मीरमधील सियाचीन हिमनदीपासून ते गुजरात राज्यातील कच्छच्या रणापर्यंत पश्चिमेकडे पाकिस्तानची सीमा आहे.
संसद भवन
भारतीय संसद भवन या वर्तुळाकार इमारतीची रचना (१९१२-१३) ब्रिटिश वास्तुकार हर्बट ब्रेकर यांनी केली. इमारतीचे बा वर्तुळकार गच्छीस २५७ ग्रेनाइट स्तंभांचा आधार आहे. संसद भवन दिल्लीला जनपथवरील राष्ट्रपतीभवन जवळ आहे.
राष्ट्रपती भवन
राष्ट्रपती भवन हे भारत देशाच्या राष्ट्रपतीचे अधिकृत निवासस्थान आहे. ३४० खोल्या असलेली ही इमारत १९२९ साली बांधली गेली. ही एक ब्रिटिशकालीन इमारत आहे.
सचिवालय इमारत, दिल्ली
सचिवालय इमारत, रायसीना टेकडी, नवी दिल्ली
लाल किल्ला
लाल किल्ला हा दिल्लीतील मुघलकालीन किल्ला आहे. याचे नाव त्यात वापरलेल्या लाल संगमरवरी दगडावरून दिलेले आहे. हा किल्ला यमुना नदीच्या किनारी आहे. मोगल सम्राट शाहजहानने हा किल्ला इ. स. १६३८ ला बांधून घेण्यास सुरू केले व तो इ. स. १६४८ मध्ये पूर्ण झाला. लाल किल्ला हासुद्धा भव्य राजवाडयापैकी एक आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंनी याच किल्ल्यावरून भारत स्वतंत्र झाल्याची घोषणा केली होती. लाल किल्ल्याची बांधणी मुघल सम्राट शाहजहान यांनी केली. मुघल सम्राट शाहजहानने हा किल्ला इ. स. १६३८ ला बांधून घेण्यास सुरू केले व तो इ. स. १६४८ मध्ये पूर्ण झाला.
भारताच्या धर्म
भारतात ६ प्रमुख धर्म आहेत. यात हिंदू धर्म : ७५-७९%; इस्लाम : १४%; बौद्ध धर्म : ६%,; ख्रिश्चन धर्म : २.५%; शिख : २%; जैन : ०.५%. असे सरासरी प्रमाण आहे. या धर्मांपैकी बौद्ध धर्म, जैन धर्म, शीख धर्म आणि हिंदू धर्म या ४ धर्मांचा उगम भारतात झाला.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश (२८ राज्ये)
अरुणाचल प्रदेश, आसाम, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, ओडिशा, कर्नाटक, केरळ, गुजरात, गोवा, छत्तीसगढ, झारखंड, तमिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, नागालँड, पश्चिम बंगाल, पंजाब, बिहार, मणिपूर, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मिझोरम, मेघालय, राजस्थान, सिक्कीम, हरियाणा, हिमाचल प्रदेश
केंद्रशासित प्रदेश (९ केंद्रशासित प्रदेश)
जम्मू आणि काश्मीर, लडाख, अंदमान आणि निकोबार, चंदीगढ, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली, दिल्ली, पुद्दुचेरी, लक्षद्वीप.
भारतातील नृत्यकला
भारतात वेगवेगळे शास्त्रीय व लोकनृत्याचे प्रकार आहेत. भांगडा नृत्य (पंजाब), बिहु नृत्य (आसाम), छाऊ (पश्चिम बंगाल), संबळपुरी (ओडिशा), घूमर (राजस्थान), लावणी (महाराष्ट्र) हे काही लोकनृत्याचे प्रसिद्ध प्रकार आहेत. तसेच आठ नृत्यप्रकारांना नॅशनल अॅकॅडॅमी ऑफ म्युझिक, डान्स ॲण्ड ड्रामातर्फे शास्त्रिय नृत्यप्रकाराचा दर्जा दिला आहे. ते भरतनाट्यम् (तमिळनाडू), कथ्थक (उत्तर प्रदेश), कथकल्ली, मोहिनीअट्टम् (केरळ), कुचिपुडी (आंध्र प्रदेश), मणिपुरी (मणिपुर), ओडिसी (ओडिशा) व सत्रीया (आसाम) आहेत.
भारतीय संगीत
भारतीय संगीत हे मुख्यत्वे दोन प्रकारात गणले जाते. भारतीय शास्त्रीय संगीत व लोकसंगीत. दोन्ही प्रकारात विविध उपप्रकार असून प्रत्येक उपप्रकाराची शैली आहे. या विविध शैलींचीच विविध घराणी असून प्रत्येक घराण्याने आपापला वेगळेपणा व ठसा भारतीय संगीतावर उमटवला आहे.
जैवविविधता
भारत हा जगातील सर्वाधिक जैववैविध्यपूर्ण देश आहे. भारतात प्राणी पक्षी व वनस्पतींमध्ये कमालीचे वैविध्य आहे. भारतात जगात आढळणारे सस्तन प्राण्यांपैकी ७.६ टक्के, पक्ष्यापैकी १२.६ टक्के, सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी ६.२ टक्के, भू-जलचर प्रजाती ४.४ टक्के, ११.७ टक्के माश्यांच्या प्रजाती व ६ टक्के वनस्पतींच्या प्रजाती आढळतात. भारताच्या अनेक प्रदेशात जैववैविध्यात स्थानिक प्रजातींची संख्या लाक्षणिक आहे. भारतीय वनस्पतींतील एकूण ३३ टक्के प्रजाती स्थानिक आहेत. पर्जन्याच्या प्रमाणात असलेली मोठ्या प्रमाणातील विषमतेमुळे भारतात विविध प्रकारची वने आहेत. अंदमान निकोबार, सह्याद्रीतील तसेच ईशान्येकडील राज्यांमध्ये आद्र विषववृतीय वने आहेत. तसेच हिमालयात सूचीपर्णी वृक्षांचे देखील जंगल आहे. या दोन टोकांमध्ये मध्य भारतात साल वृक्षाची आद्र पानगळी प्रकारची जंगले आहेत. तसेच बहुसंख्य साग वृक्ष असलेले शुष्क पानगळी जंगले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक व राजस्थानमधील अतिशुष्क प्रदेशात बाभूळसारख्या काटेरी वनस्पतींची जंगले आहेत.
भारतीय अर्थव्यवस्था
भारताची अर्थव्यवस्था जगातील १२ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारताची अर्थव्यवस्था ही मुख्यत्वे शेतीवर आधारित अर्थव्यवस्था होती. परंतु अलिकडच्या काळात भारताने औद्योगिक क्षेत्रातही बरीच आघाडी मारलेली आहे. भारतात काम करणाऱ्या लोकांपैकी दोन-तृतियांश लोकांचा उदरनिर्वाह अजूनही शेती अथवा शेतीशी संबंधित उद्योगांवर चालतो, परंतु अर्थव्यवस्थेत विविध प्रकारच्या सेवांचाही वाढता वाटा आहे आणि अलिकडे सेवांवर आधारित व्यवसायही अर्थव्यवस्थेत अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. भारताच्या वार्षिक सकल उत्पन्नामध्ये सध्या १७ % वाटा शेतीचा आहे, २८ % वाटा उद्योगांचा आहे, तर ५५ % वाटा सेवांचा आहे.
थोडक्यात माहिती
भारताचे क्षेत्रफळ : ३२८७२६३ चौ.कि.मी.
भारताची लांबी (दक्षिण-उत्तर) : ३,२१४ कि.मी.
भारताची रुंदी (पूर्व-पश्चिम) : २,९३३ कि.मी.
जंगल व्याप्त क्षेत्राचे एकूण भू भागाशी प्रमाण : २३%
भारताच्या भू-सीमा : १५,२०० कि.मी.
भारताला स्पर्श करणारे एकूण देश : ७
भारताची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार : १२१,०१,९३,४२२
भारताची पुरुष संख्या सन २०११ च्या जनगणनेनुसार : ६२,३७,२४,२४८
भारताची स्त्री संख्या २०११ च्या जनगणनेनुसार : ५८,६४,६९,१७४
भारताचा साक्षरता दर २०११ च्या जनगणनेनुसार : ७४.०४%
पुरुष साक्षरता दर २०११ च्या जनगणनेनुसार : ८२.१४%
महिला साक्षरता दर २०११ च्या जनगणनेनुसार : ६४.४६%
भारताची घनता २०११ च्या जनगणनेनुसार : ३८२ प्रति चौ. किमी.
भारतास लाभलेला समुद्रकिनारा : ७,५१७ कि.मी.
भारताची राजधानी : दिल्ली
भारताचे राष्ट्रगीत : जन-गण-मन
भारताचे ध्येय वाक्य : सत्य मेव जयते
राष्ट्रीय गीत : वंदेमातरम्
जन-गण-मन या राष्ट्रगीताचे कवि : रविंद्रनाथ टागोर
राष्ट्रीय गीत वंदेमातरमचे कवी : बंकीमचंद्र चटर्जी
भारताचा राष्ट्रध्वज : तिरंगी झेंडा
राष्ट्रीय फळ : आंबा
राष्ट्रीय फूल : कमळ
भारताचा राष्ट्रीय पक्षी : मोर
भारताचा राष्ट्रीय प्राणी : वाघ
भारतात एकूण घटक राज्ये : २९
भारतात एकूण केंद्रशासित प्रदेश : ७
भारतात सर्वाधिक साक्षर राज्य : केरळ
भारतात सर्वात कमी साक्षर राज्य : बिहार
भारतात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रदेश : राजस्थान
भारतात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा : ठाणे (महाराष्ट्र)

