पिकांचे मोठे नुकसान, १४ लाख ४५ हजार हेक्टर क्षेत्र बाधित
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांत राज्यात ऑगस्ट २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीचा फटका राज्यातील तब्बल २९ जिल्ह्यांतल्या १९१ तालुक्यांना बसला आहे. मुसळधार पावसामुळे ६५४ पेक्षा जास्त महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे नुकसान झाले असून राज्यात एकूण १४ लाख ४४ हजार ७४९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी दिली.
राज्यातील १२ जिल्ह्यांत १० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाले आहे. सर्वाधिक बाधित जिल्ह्यांमध्ये नांदेड ६ लाख २० हजार ५६६ हेक्टर, वाशिम १ लाख ६४ हजार ५५७ हेक्टर, यवतमाळ १ लाख ६४ हजार ९३२ हेक्टर, धाराशिव १ लाख ५० हजार ७५३ हेक्टर, बुलढाणा ८९ हजार ७८२ हेक्टर, अकोला ४३ हजार ८२८ हेक्टर, सोलापूर ४७ हजार २६६ हेक्टर आणि हिंगोली ४० हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाली आहे.
मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार बाधित भागातील सुरू केलेले पंचनाम्याचे काम अंतिम टप्प्यात असून शेतक-यांना योग्य ती मदत तातडीने देण्यात येईल. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. शेतकरी बांधवांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही दत्तात्रय भरणे यांनी दिली.
सोयाबीन, कापूस,
मकाचे मोठे नुकसान
अतिवृष्टीमुळे सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले. काही ठिकाणी भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी आणि हळद या पिकांनाही फटका बसला आहे.
अतिवृष्टीने बाधित जिल्हे
नांदेड, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, सोलापूर, हिंगोली, धाराशिव, परभणी, अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धुळे, जळगाव, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रायगड आणि नागपूर या जिल्ह्यांत अतिवृष्टीने पिकांची हानी झाली आहे. तसेच पशुधनही दगावले आणि घरांचीही पडझड झाली आहे.
नांदेडमध्ये सर्वाधिक हानी,
लातूर दुस-या क्रमांकावर
नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. लातूर दुस-या क्रमांकावर, हिंगोली तिस-या, धाराशिव नुकसानीत चौथ्या क्रमांकावर आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील २८९५ मालमत्तांचे नुकसान झाले. ६ मालमत्ता पुरात वाहून गेल्या. ४१५ मालमत्तांचे कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाले. २८९५ मालमत्तांची अशंत: पडझड झाली. ७२ झोपड्या पुरात वाहून गेल्या. २५६ जनावरांचे गोठेही पडले तर १ हजार ४९ सर्व प्रकारांतील जनावरांचा मृत्यू झाला. ५० व्यक्ती पुरात वाहून व वीज पडून दगावल्या.