भारतीय जेवणातील पदार्थ आरोग्याला हानिकारक

yongistan
By - YNG ONLINE
आहारात कार्बोहायड्रेटचे प्रमाण अधिक, प्रोटिनचे प्रमाण अत्यल्प
नवी दिल्ली : वृत्तसंस्था 
भारतीय लज्जतदार जेवण त्याच्या स्वादासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. परंतु इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) एका नवीन अहवालाने भारतीय जेवणातील पदार्थ रुचकर असले तरी आरोग्यासाठी पोषक नाहीत, असे म्हटले आहे. भारतीय आहारात कार्बोहायड्रेटचे प्रमाण खूपच जास्त प्रमाणात आहे. आणि त्यात प्रोटीनचे प्रमाण खूपच कमी असल्याचे म्हटले आहे.
आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रीशनच्या वतीने केलेल्या संशोधनात भारतीय लोकांच्या डाएटचे विश्लेषण केले आहे. त्यानुसार झालेल्या संशोधनात असे आढळले की, या आहाराने लोकांचे पोट तर भरले जाते. परंतु त्यातून शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही. भारतीय आहारामुळे शरीराचे फारसे पोषण होत नाही. उलट या आहाराने लठ्ठपणा आणि डायबिटीजचे प्रमाण वाढत चालले आहे आणि स्रायू कमजोर होत चालले असल्याचे आसीएमआरच्या अहवालात म्हटले आहे. 
भारतीय आहारात ६५ ते ७० टक्के कार्बोहायड्रेट असते तर प्रोटीनचे प्रमाण केवळ १० टक्के असते. या अहवालानुसार भारतीय जेवणातील थाळीत भात, रोटी आणि बटाट्यासारखे कार्बोहायड्रेट पदार्थ प्रचंड प्रमाणात खाल्ले जातात. आयसीएमआरच्या मते त्यांच्या जास्त प्रमाणामुळे शरीरातील साखरेची पातळी खूप वाढते आणि फॅट जमा होते. त्यामुळे वजन वाढणे, थकवा येणे आणि डायबिटीजसारखे आजार होतात.
प्रत्येक व्यक्तीला रोज ६० ग्रॅम प्रोटीनची गरज असते. परंतु बहुतांशी भारतीयांच्या जेवणात केवळ ३५ ते ४० ग्रॅम प्रोटीन असते. डाळ, दूध, अंडी आणि सोयासारखे पदार्थ भारतीय ताटातून गायब आहेत. त्याचा परिणाम इम्युनिटी आणि मसल स्ट्रेन्थवर होत आहे. आयसीएमआरच्या रिसर्चनुसार दक्षिण भारतीय लोक तांदळावर अवलंबून असतात तर उत्तर भारतात गव्हाचा वापर सर्वाधिक होतो. तूर पूर्वोत्तर राज्ये आणि किनारी प्रदेशात मासे आणि नारळाने थोडे चांगले प्रोटीन मिळते. परंतु एकूण संपूर्ण देशात डाएट संतुलनाचा अभाव आहे.

डायटमध्ये सुधारणा 
करणे अत्यंत आवश्यक
आयसीएमआरने लोकांना आपल्या डाएटमध्ये सुधार करण्याचा इशारा दिला आहे. लोकांनी त्यांच्या डाएटमध्ये प्रोटीन आणि हेल्दी फॅटचा समावेश केला नाही तर येणा-या काळात आजारांचे प्रमाण वाढेल. त्यामुळे थाळीत २५ टक्के प्रोटीन, ५० टक्के कार्ब्स आणि २५ टक्के हेल्दी फॅटचे संतुलन राखणे गरजेचे आहे. तुम्ही रोज थाळीत डाळ, दूध, अंडी आणि दही, सोया आणि भाज्यांचा समावेश करायला हवा तरच आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे.